ठाकरे यांचे नव्या उपायुक्तांना आदेश

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

नवी मुंबईतील वाढत्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता कडक पाऊले उचललेली आहेत. नवनिर्वाचित पालिका उपायुक्तांनाच ठाकरे यांनी अतिक्रमण विरोधी विभागाची जबाबदारी देण्याचे ठरविले आहे, अशी खात्रीलायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या हाती आली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेवर मागील ३० वर्षांपासून गणेश नाईक व त्यांच्या कुटुंबियांचेच वर्चस्व आहे. या कालावधीत या सर्वांनी प्रचंड भ्रष्टाचार केला. त्यामुळे तेथे अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झालेला आहे. अर्थात त्यामुळे नवी मुंबईला बकाल स्वरूप आलेले आहे व त्यामुळे स्थानिक जनतेनेच नाईक व त्यांच्या कुटुंबियांचे वर्चस्व कमी केल्याचे आढळून येते.

नाईक यांच्या या भ्रष्ट व मनमानी कारभाराला सुरुंग लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही कडक पाऊले उचललेली आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी डॉ. राहुल गेठे यांची प्रतिनियुक्ती केली. त्यामुळे नाईक व त्यांच्या कुटुंबियांचे अक्षरश: धाबे दणाणले आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी डॉ. गेठे यांची प्रतिनियुक्ती करून महिनाही उलटत नाही, तोच त्यांनी नवा बाँम्ब टाकला आहे. त्यांनी गेठे यांना थेट ‘मातोश्री’वर बोलावून घेतले व अतिक्रमण विरोधी विभागाची जबाबदारी घेण्याचे आदेश दिले. आगामी काळात नवी मुंबईतील फूटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करा. तेथील अनधिकृत फेरीवाले हटवा. अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवा. अर्थात त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आदर्श न ठेवता मुंबईचे माजी महानगरपालिका उपायुक्त गो. रा. खैरनार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, असेही सांगितले, असे सूत्रांचे विश्वसनीय वृत्त आहे.